औरंगाबाद : गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. अहमदाबाद मध्ये असलेल्या या स्टेडियमला यापूर्वी सरदार पटेल यांच्या नावाने ओळखले जायचे. होते. मात्र, राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या लोकार्पण सोहळ्यात या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आले. त्यावर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी काही शिवसैनिकांनी उचलून धरली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नावाने जर गुजरातमध्ये स्टेडियम होत असेल तर महाराष्ट्रात आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हेच दैवत आहेत. त्यांच्या नावाने वानखेडे स्टेडियम ओळखले जावे, अशी काही शिवसैनिकांची इच्छा आहे. पुढील काळात या बाबत राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे. या मैदानाने अनेक खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत. अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धेचे साक्षीदार असलेले वानखेडे स्टेडियम आता राजकारण्यांच्या रडारवर जाण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मिडियावर तशा पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.
