‘पवारांसारखे मार्गदर्शक असल्याने आम्हाला राष्ट्रपती राजवटीची भीती नाही’ – संजय राऊत
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहे. कोरोनाला रोखण्यात ‘ठाकरे’ सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत विरोधकांनी राज्यपालांची अनेकदा भेट घेतली. शिवाय सरकारच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शनिवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही स्वतः जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची हालचाल तर नाही ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
यासगळ्या चर्चेबाबत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करत, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता फेटाळली. राज्य सरकार कोरोनाच्या बाबतीत योग्य ते काम करत आहे. महाराष्ट्रातील जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. खुद्द शरद पवारांसारखे मार्गदर्शक आमच्या सरकारला लाभल्यामुळे आम्हाला कुठलीही चिंता नाही. मुख्यमंत्री आणि राज्यपालांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. आज पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र त्याला राजकीय बाजूने बघू नये. राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार या चर्चेला काहीही तथ्य नाही. शरद पवारांसारखे मार्गदर्शक लाभले असल्याने आम्हाला त्याची चिंता नाही. असेही राऊत म्हणाले.

