दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने मुंबईत पुन्हा आपला जोर धरला. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झालेला असून पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहतुककोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे मिठी नदीन धोक्याची पातळी गाठली. पाऊस थांबला नाही तर धावपट्टीवर पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर, काठावरील क्रांतीनगर वसाहतीला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगितलं जातंय.
मुंबईसह उपनगरांत काल रात्रीपासूनच पडणाऱ्या पावसाचा जोर आज सकाळपासून वाढला आहे. लालबाग, परळ, गोरेगाव, मिरा रोड, अंधेरी, वांद्रे परिसरात सकाळी जोरदार बरसला. पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

