गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज : २२०० जादा बसेस सोडणार
गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे.
यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची सोय केली आहे. या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

यंदा लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २२०० बसेस मुंबईच्या गणेशोत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून,येत्या २७ जुलै (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे २७ जुलै पासून करता येणार आहे.
