प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी
पुणे: गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तब्बल 14 कोटी 7 लाख रुपयांचा निधी वसूल करण्याचे आदेश केंद्र शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याबाबत जिल्हयातील सर्व तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. काही दिवसांपुर्वी तामिळनाडूमध्ये या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यातील बोगस लाभार्थी शोधण्याचे आदेश दिले.
देशातील अल्प भूधारक शेतकरी व पाच ऐकर व त्यापेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये जमा केले जातात. पुणे जिल्ह्यात आता पर्यंत या योजने अंतर्गत 5 लाख 31 हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 16 हजार 118 शेतकरी सरकारी नोकर, टॅक्स भरणारे मोठे व्यवसायिक, अनेक मयत व्यक्तींचा देखील समावेश झाला असल्याचे समोर आले आहे. या अपात्र लोकांच्या बँक खात्यात आता पर्यंत तब्बल 14 कोटी 7 लाख रूपये जमा केले असून, आता या सर्व पैशांची पुन्हा वसुली करण्यात येणार आहे.

