शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण, आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार
नवी दिल्ली: दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आज शंभर दिवस पूर्ण झाले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आणि भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी जोपर्यंत सरकारन नवीन कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील असा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांची या मुद्द्यावर केंद्र सरकारशी चर्चा करण्याची आजही तयारी आहे. तसेच हे आंदोलन दीर्घ काळापर्यंत सुरु ठेवण्याचीही तयारी आहे. केंद्र सरकारने जर नवीन कायदे मागे घेतले नाहीत तर आम्ही आमच्या कृषी उत्पादनांची विक्री थेट संसदेत जाऊन करु असा इशाराही टिकेत यांनी दिला.
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या आधी शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये या कायद्यांवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत पण कोणताही तोडगा निघाला नाही. इतक्यात सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली दिसली नाही. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे हे देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणतील असं केंद्र सरकारचं मत आहे. संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण शेतकऱ्यांशी चर्चेसाठी केव्हांही तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं.
शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हजारो लोकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून हिंसाचार घडवला होता. त्यावेळी या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्येही झडप झाल्याचं पहायला मिळालं होतं. काही आंदोलकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रवेश करुन त्या ठिकाणी शीख धर्माचा ध्वजही फडकवला होता. दिल्ली आंदोलनाच्या दरम्यान ५०० हून अधिक पोलिस जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यूही झाला होता. दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात दीप सिद्धू सहभागी होता.