शेतकऱ्यांसाठी पवारांची भूमिका, उद्याच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा
मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत लवकर तोडगा काढा; हे दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर उद्याच्या भारत बंदला पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शांतपणे व कोविडकाळातील मर्यादांचे पालन करून या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे व या कायद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.