नवे कृषी कायदे आणल्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले. शेतकरी सोबत नसते तर भाजपाला स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळाले नसते, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात आयोजित पत्र परिषदेत संबित पात्रा यांनी गोवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ दिला. कृषी कायदे जाहीर केल्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. कारण मोदींनी देशातील गरीब आणि शेतकरी वर्गाचे नेहमी हीत पाहिले आहे. राहुल गांधींना फक्त ट्विट करता येते. त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नाही हे वास्तव आहे, अशी टीका त्यांनी केली.
गोवा जिल्हा परिषदेचे निकाल देखील हाती आले आहेत. बिहार विधानसभेपासून ते आतापर्यंत लागलेल्या सर्व निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपाला मोथे यश मिळाले आहे. देशातील शेतकरी मोदींसोबत नसता तर इतके यश मिळाले असते का?, असा प्रश्न संबित पात्रा यांनी केला.
शेतकरी आंदोलनाला कोण ‘हायजॅक’ करू पाहात आहे हे सर्वांना माहीत आहे. माध्यमांमध्ये सारंकाही दाखवले जात आहे. काही लोकांना पंतप्रधान मोदींविरोधात अभद्र भाषेत टीका करताना देखील पाहिले आहे, असा आरोप संबित यांनी केला.
आसाम, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, गोवा येथील सर्वच स्थानिक आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. “गाव, गरीब, किसान आणि मजूर हे देशाचा कणा आहेत. हे जर केंद्र सरकारसोबत नसते तर आज निवडणुकांचे निकाल वेगळे असते. मणिपूरपासून कच्छपर्यंत १२ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. कोरोना, प्रवासी मजूर, कृषी कायदे आणि आर्थिक संकट या चार मुद्द्यांवरुन विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण आत्मनिर्भर भारताचा विजय झाला. देशातील ८० कोटी गरीब जनतेपर्यंत धान्य पुरवण्याचे काम मोदी सरकारने केले, असे संबित पात्रा म्हणाले.
