तर भाजप नंतर राठोडांच्या राजीनाम्यासाठी ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव.
मुंबई: राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात केलेल्या कथित आत्महत्येप्रकरणात राठोड यांचं नाव घेतलं जात असल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे.
विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी राठोडांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. या संदर्भात एक पत्र लिहिले असून त्यामध्ये संजय राठोड यांच्याकडून काम होत नसल्याच्या तक्रारी देखील असून गेल्या पाच वर्षात संघटनेसाठी कोणतेही काम करण्यात आले नाही असे देखील नमूद केले आहे.
संजय राठोडांमुळे पक्षाचं काम करण्यात स्थानिक पातळीवर अडचण येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहेत. यावर पक्षप्रमुख म्हणून काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
