कोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेली कृषि विधेयके ही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच आहेत. परंतू केवळ आणि केवळ काँग्रेस याबाबत गैरसमज पसरवून राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे. या विधेयकांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दानवे सोमवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार भागवत कराड, सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांची उपस्थिती होती.
दानवे पाटील म्हणाले, भाजपचे राज्यसभेत बहुमत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी मंत्र्यांनी उत्तर द्यावे अशी कांग्रेसची मागणी होती. मात्र तेथेही विधेयक मंजूर झाल्यामुळे आता कांग्रेस केवळ राजकारणासाठी या विधेयकांचा वापर करत आहे. बाजार समित्या बंद होणार नाहीत, तेथील
हमीभावाची खरेदी बंद होणार नाही. या क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढेल.व्यापाऱ्यांच्या स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यातून त्याला चांगला दर मिळणार आहे. आता पॅन कार्ड असणारा कोणताही व्यापारी बाजार समितीच्या लिलावात भाग घेवू शकणार आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या घराकडे जातील. तेव्हा माल किती रूपयांना द्यायचा हे शेतकऱ्यांच्या हातात असेल. माल विकला नाही तरी तो घरात सुरक्षित राहील, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
