अलिबाग कोर्टाकडून अर्णब गोस्वामींना दिलासा, पोलिसांची मागणी फेटाळली
अलिबाग: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर दुपारी अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर कोर्टाने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं. नंतर पुन्हा संध्याकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आली. जेष्ठ वकील आबाद फोंडा यांनी गोस्वामी यांच्यावतीने युक्तिवाद केला.
पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली, कोणताही सबळ पुरावा नसताना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे हे कोर्टाला सांगता आलं नाही, तर अन्वय नाईक,आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध याबद्दल रायगड पोलीस न्यायालयाला समजून सांगू शकले नाहीत, पुरावेही देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचं सांगत न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबागनंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध नवा गुन्हा दाखल केला आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम ३५३ नुसार अर्णब गोस्वामीवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे असे आरोप करत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

