वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी केली फडणवीसांची पाठराखण
मुंबई: हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस असून यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलांचा मुद्दा मांडत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने वीज बिलासंबंधी घोषणा करुन फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. नितीन राऊत यांना घोषणा करा असं आम्ही सांगितलं नव्हतं असंही यावेळी ते म्हणाले. वीज बिलाच्या सवलतीवरुन काय झालं अशी विचारणा फडणवीसांनी यावेळी केली.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनात वाढीव वीज बिलांचा मुद्दा मांडत असताना सतारूढ पक्षाने गोंधळ घालणे सुरु केले. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांचे समर्थन केले. सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना बजावले, फडणवीस योग्य भूमिका मांडत आहेत. त्यानंतर फडणवीस यांनी याबाबतची बाजू मांडली.
फडणवीस म्हणालेत, सरकारने वीज बिलासंबंधी घोषणा करुन फसवणूक केली. वाढीव बिलांची रकम कमी करा, अशी घोषणा करा, असे आम्ही नितीन राऊत यांना सांगितले नव्हते. वीज बिलाच्या सवलतीचे काय झाले? अशी विचारणा फडणवीसांनी केली.
मुख्यमंत्री महाविकास आघाडीत विसंवाद नाही असे सांगतात पण वीज बिलावरुन काय संवाद आहे? प्रत्येकजण वेगेगले वक्तव्य करत आहेत. वापरलेल्या वीजेचे बिल भरण्यासंबंधी माझे काही म्हणणे नाही. पण जी वीज वापरलीच नाही त्याचे बिल का भऱणार?. महाविकास आघाडीतील संवाद निर्णयात दिसू द्या. माझे तर सरळ म्हणणे आहे की, वीज बिलासंबंधी घोषणा करुन सरकारने फसवणूक केली आहे, असे फडणवीस म्हणालेत.
दरम्यान यावेळी गोंधळ सुरु झाला असता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते योग्य भूमिका मांडत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सरासरी बिल देण्याची जी पद्धत आहे ती तातडीन थांबवली पाहिजे. अन्यथा हे विषय सातत्याने येत राहतात. मीटर, घऱ नाही त्यालाही बिल जातं अशी ही पद्धत आहे”.
विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात या मुद्द्यावर वाद सुरू झाला. नाना पटोले म्हणालेत, ही पद्दत या सरकारची नाही, अनेक वर्षांची परंपरा आहे. ही पद्धत बदलली पाहिजे हेच मला सांगायचे आहे. हे मागच्या काळात नव्हते असा काही भाग नाही. त्यामुळे हा राजकीय विषय नाही.