ठाकरे-पवारांना माझ्यामुळे रायगड दौऱ्यावर जाणे भाग पडले- प्रवीण दरेकर
मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील जनजीवन उद्ध्वस्त केले. वादळ येऊन गेल्यानंतर सर्वांत आधी आपण कोकण दौ-यावर विशेषतः रायगडला गेलो होतो. माझ्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यापाठोपाठ शरद पवार यांना रायगड दौ-यावर जाणे भाग पडले, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाने कोकण उद्ध्वस्त झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री तीन महिन्यांनंतर घराबाहेर पडून जहाजाने रायगड जिल्ह्याच्या दौ-यावर गेलेत. त्यांच्यापाठोपाठ शरद पवार हेदेखील दोन दिवसांच्या कोकण दौ-यावर गेले व त्यांनी पाहणी केली. त्यांच्या दौ-यावरून प्रवीण दरेकर यांनी पवारांना आपल्यामुळेच रायगड दौरा करावा लागला असे म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, १०० कोटी वगैरे अशा तुटपुंजा मदतीने कोकणचे नुकसान भरून निघणार नाही. आता तरी कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसणे सोडून द्यावे, अशीही टीका दरेकर यांनी केली आहे. तसेच कोकणाने महाविकास आघाडी सरकारला भरभरून दिले आहे. त्यामुळे या सरकारने संकटकाळात कोकणाची मदत करण्यास हात आखडता घेऊ नये, असेही दरेकर म्हणाले. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांच्या कोकण दौ-यावरून भाजपाने सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.