गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना सिंधुदुर्गात ७ ऑगस्टपर्यंतच एंट्री
सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्गात देखील नियम कठोर केले गेले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची पंचाईत झाली आहे. दरवर्षी मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जातात. यंदा मात्र सिंधुदुर्ग प्रशासनाने त्यावर निर्बंध घातले असून येत्या ७ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंतच सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ई पास देखील बंधनकारक करण्यात आला असून त्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. जेणेकरून गणेशोत्सवाच्या आधी १४ दिवस त्यांना क्वारंटाईन ठेवता येईल. त्याशिवाय येणाऱ्या चाकरमान्यांनी १४ दिवस क्वारंटाईन होण्यासाठी निवासाची व्यवस्था, तिथल्या सोयी-सुविधा यांची व्यवस्था लावूनच यायचं आहे. त्यासोबत त्यांच्या घरच्यांना देखील १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातून सिंधुदुर्गात जाणाऱ्या चाकरमान्यांना ८ तारखेपासून सिंधुदुर्गात नो एंट्री असेल.

