जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून चाकरमान्यांची कोंडी करण्याचा सरकारचा प्लॅन? : आशिष शेलार
मुंबई : देशभरासह राज्यात सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी अनेक चाकरमानी कोकणाच्या दिशेने जात असतात. परंतु आता त्यांना ७ ऑगस्टपूर्वीच आपलं गाव गाठावं लागणार आहे. सिंधुदुर्गात पार पडलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठतीच तसा प्रस्ताव सादर करून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रस्तावावरून शेलार यांनी सरकारला काही सवाल केले आहेत. “लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करु नका. तसंच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला आहे का? परस्पर घोषणा केली का? सरकारला हे मान्य आहे का?,” असे सवाल त्यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरवरून सरकारला याबाबत प्रश्न केले आहेत.
लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करु नका, तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य ?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 10, 2020

