क्षमता २२०० बेडची, मग फक्त ६८८ जणच क्वॉरंटाइन कसे : टोपे
औरंगाबाद : शहरात इस्टिट्यूशनल क्वॉरंटाइनची क्षमता २२०० इतकी असताना प्रशासनाने केवळ ६८८ इतकीच क्वॉरंटाइनची क्षमता का वापरली, शिवाय कोरोनाच्या एका इंडेक्स रुग्णामागे किमान १५ हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधण्याऐवजी मे महिन्यात केवळ सहा ते सात जणच का शोधले, असा सवाल करत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला जाब विचारला. गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीतूनच ही गंभीर बाब समोर आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुरुवारी लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी कोरोनासंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत टोपे यांनी ही माहिती दिली. जास्तीत जास्त पाठपुरावा करणे आणि चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.
आयसीयूच्या बाबतीत योग्य मॉनिटरिंग झाले पाहिजे : ते पुढे म्हणाले की, आयसीयूच्या बाबतीत योग्य मॉनिटरिंग झाले पाहिजे. सीनियर प्रोफेसर गेले पाहिजेत. केवळ निवासी डॉक्टरांच्या भरवशावर काम होऊन चालणार नाही. त्यासाठी आयसीयूत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. दरम्यान, खासगी रुग्णालयाच्या प्रत्येक बिलावर ऑडिटरची सही असेल. त्यातून खासगी रुग्णालये जास्तीचे बिल घेणार नाहीत. कुठल्याही प्रकारे रुग्णांना लुबाडले जाणार नाही. त्यासाठी रुग्णांच्या बिलावर सरकारी ऑडिटरची सही असणार आहे. त्यामुळे ऑडिटरवरही त्याची जबाबदारी असेल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.