अस्मानी संकट अद्यापही कायम, आज ८ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई :- गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचे संकट अद्यापही कायम आहे. परतीच्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान केलं. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी २२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद इथं आज मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी ५१ ते ७५ टक्के मुसळधार पावसाची होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.