सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात यावे – सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे
सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात यावे. असे आदेश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात त्याचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आला.
स्वाधार योजनेचाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची ज्या जिल्ह्यात प्रलंबित कामे आहेत ती तात्काळ पूर्ण करावीत. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेचा लाभ पात्र भूमिहीनांना मिळवून देण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी डॉ. खाडे यांनी सांगितले.