कोल्हापूर जिल्हा बँकेकडून काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे धोरण ठरविले आहे. लॉकडाऊनमुळे कच्च्या मालाचे म्हणजेच काजू बीयांचे दर पडलेले असल्यामुळे अशा तारणावर बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरविणार आहे . तसेच शेतकऱ्यांना बँक खावटी कर्ज देणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बँकेच्या संचालक मंडळाकडे शेतकर्यांच्यावतीने बँक संचालक व आमदार राजेश पाटील, संचालक संतोष पाटील आणि संचालक अशोक चराटी यांनी ही मागणी आग्रहीपणे मांडली. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन या मागणीला तातडीने मान्यता दिली.
लॉकडाऊनमुळे काजू बीयाच्या कच्च्या मालाच्या खरेदीला अत्यंत अल्प मागणी आहे. तसेच व्यापारीही शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी विकास संस्थांनी शेतकऱ्यांकडून काजू बियांचा कच्चामाल योग्य दरात खरेदी करून, दर वाढल्यानंतर त्याची विक्री करता येईल या उद्देशाने बँकेकडून नजरगहाण कर्ज मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. एक वर्षाच्या मुदतीने कमी व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे.
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे काजू पिकाला बाजारपेठच उपलब्ध झाली नाही. अशातच व्यापारीही अल्पदराने शेतकऱ्यांकडून कच्चामाल खरेदी करीत आहेत. परिणामी, गेल्या वर्षी दीडशे रुपये किलो असणारा काजू यावर्षी ८० रुपये किलो एवढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा कच्चामाल विकास संस्थांना योग्य दरात घेता यावा म्हणून नजरगहाण व मालतारण कर्ज मंजुरीचे धोरण बँकेने स्वीकारले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या काजू मालाची विक्री झालेली नाही अशा शेतकऱ्यांना ३० टक्के खावटी कर्ज देण्याचाही निर्णय घेतला आहे.