अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार
पुणे: मराठा आरक्षणालामिळालेल्या स्थगितीमुळे रखडलेली इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया अखेर येत्या गुरुवारपासून सुरु होणार असून एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रवेशाची दुसरी नियमित फेरी २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार असून तिसरी प्रवेश फेरी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. मराठा आरक्षित जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या गटात प्रवेश देण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करू नये अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. SEBC मधून अॅडमिशन घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे पिंपरी चिंचवड व इतर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या एसीबीसी संदर्भातील निर्णयाच्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया काही महिने स्थगित ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवेशास विलंब झाला आहे.यापूर्वी प्रवेश नाकारलेल्या, प्रवेश रद्द केलेल्या किंवा प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
विद्यार्थ्याने निवडलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
पहिल्या प्रसंती क्रमानुसार प्रवेश मिळू नाही प्रवेश घेतला नाही किंवा नाकारल्यास संबंधित विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी दिली जाणार नाही. या विद्यार्थ्यांना केवळ विशेष फेरीमधून प्रवेशाची संधी मिळू शकेल.
घेतलेला प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील अनियमित फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे या विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबर २०२० नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षित न ठेवता पार पाडण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबर २०२० पूर्वी एईसीबी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील, परंतू त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार असल्याचंही ठाकरे सरकारने म्हटलं आहे.