मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला? आशिष शेलार यांचा रोख कोणाकडे?
मुंबईः केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अधित तीव्र होऊ लागलं आहे. आज देशभरात विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावरून भाजप नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात ही शेतकरी आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. कोल्हापूर, सांगली, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. यांवर भाजप नेते यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.
आशिष शेलार यांनी एक ट्विट करत निशाणा साधला आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला? कोणी कामगारांना फसवलं? कोणी कामगारांना उद्ध्वस्त केलं? कोणी मालकांचे फायदे करुन दिले?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत. शिवाय, माझ्या शेतकरी बांधवानो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, असा सूचक ट्विट शेलार यांनी केलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का? काँग्रेसने स्वतः जे केले त्या विरोधातच भारत बंद? काँग्रेसच्या फसवणूकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये!, असं आवाहन शेलार यांनी केलं आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?
माझ्या शेतकरी बांधवानो,
तुम्ही आठवा थोडे मागचे,
मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत
डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2020

