एकीकडे रत्नागिरीत पूरग्रस्त स्थिती असताना विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. भर पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर पुढे जाऊन आणखी दुष्काळ सहन करावा लागणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.
नागपूर शहर व ग्रामीण भागात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. १ जूनपासून आतापर्यंत २१४.८ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. राज्यातील इतर भागांमध्ये मात्र मान्सूनची विशेष मेहरबानी दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात ससरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पाऊस झाला. नागपुरात मात्र रविवारी कडक उन्हामुळे तापमान ३७.१ डिग्री सेल्सिअस इतके राहिले. ते सरासरीपेक्षा ५ डिग्री अधिक होते. वर्धेत कमान तापमान ३६.५ डिग्री, ब्रह्मपुरीमध्ये ३६.४ डिग्री, अकोला ३६.१, चंद्रपूरमध्ये ३६ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.