पदवीधर निवडणुकीवरुन औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आघाडीत बिघाडी? बंडखोरीची शक्यता
मुंबई : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारीवरून आता नागपूर आणि औरंगाबादमध्ये आघाडीतील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करण्यास तयार नाहीत. एवढेच नव्हे तर दोन्ही ठिकाणी परस्परांविरोधात बंडखोर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. आत राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीने रिंगणात स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केल्याचे समजते. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून केवळ दबावतंत्रासाठी ही खेळी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही महाविकास आघाडीतील परिस्थिती फारशी आलबेल नाही. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून काँग्रेसचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरु आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही काँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी काँग्रेस नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
