अमरावती: उत्तरप्रदेशमधील हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तेथील राज्य सरकारच्यावतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
हाथरसमध्ये जे काही घडलं ते अतिशय वेदनादायी घडले आहे. हे सर्व मानवजातीसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. हा खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवला गेला पाहिजे सुप्रिम कोर्टाने राजधर्माचे पालन केले पाहिजे. या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्या पीडितेचे कुटूंब जिवंत राहीले पाहिजे असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे. त्यामूळे याचा निकाल काय लागणार, पीडीतेला न्याय मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
