४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरु
राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी येत्या ६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. यादरम्यान भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला कृषी कायद्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही देशभरात ट्रॅक्टर रॅली काढू, असा निर्वाणीचा इशारा टिकैत यांनी दिला आहे.
कृषी कायद्याला रद्द करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करु. येथील आंदोलनदेखील सुरु राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर भेट घेतल्यानंतर राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं.
भारतीय किसान युनिअनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं राकेश टिकैत यांनी जाहीर केलेलं आहे. ‘जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही’ असा नारा राकेश टिकैत यांनी दिलेला आहे. यावेळीच त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असं मोठं विधान केलं होतं.