सिंधुदुर्ग: मालवणी खाजो पण आमचो आणि गुजराती फापडो पण आमचो. शिवसेनेने घेतलेल्या गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झालंय. त्यातून त्यांचं व्होट बॅक घसरली आहे. त्यामुळे शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना केली आहे.शिवसेनेने केलेल्या गेल्या पाच वर्षांतील अविकसित कामगिरीवर मुंबईकर जनता नाराज आहे. त्यामुळे त्यांना सर्व मुंबईकर धडा शिकवतील, असेही ते म्हणाले .
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरुन शेलार यांनी टीकास्त्र सोडले.
शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे , असा दावा शेलार यांनी केला.
शिवसेनेची भूमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे. मात्र या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचं काम शिवसेना करतेय. भाजपला मुंबईचं विभाजन, त्रिभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत. अशा पद्धतीने मुंबईचं विभाजन काँग्रेस आणि त्याला मुक संमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता त्यांना स्वीकारणार नाही. भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
राज्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यापासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुनही शेलार यांनी टीका केली .
