शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शिवसेना वांद्रे-कुर्ला संकुलातील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालावर १७ जुलै रोजी मोर्चा काढणार आहोत, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेनेच्यावतीने काढला जाणारा मोर्चा हा पीकविमा कंपन्यांसाठी इशारा मोर्चा असेल. शिवसेनेचा मोर्चा हा शेतकरी मोर्चा नसून, तो शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असणार आहे. हे आंदोलन नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. इशारा मोर्चानंतरही जर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली निघाली नाहीत, तर शिवसेनेच्या भाषेत विमा कंपन्यांशी बोलू.
पीकविमा हा विषय फक्त शेतकऱ्यांचा नाही. तर आपल्या अन्नदात्याचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे, असे आवाहन करत, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारावर बँकांची नोटीस लागते. त्याचप्रमाणे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या दारावर लावण्यात यावीत, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी बँकांना केली.
