कोल्हापुरातील पी.एम किसान योजनेतील 13 कोटी रुपयांची होणार वसुली
कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील अपात्र 13 हजार 609 शेतकऱ्यांकडून तब्बल 13 कोटी 40 लाख 82 हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. ही रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. रक्कम वसूल होणाऱ्यांपैकी तब्बल 13 हजार 437 शेतकरी हे आयकर भरणारे आहे.
या योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे निकष यापूर्वीच केंद्र शासनाने जाहीर केले आहेत. यापैकी आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतील, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते. तरीही जिल्ह्यात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही अर्ज केले. केंद्र शासनाने दिलेल्या यादीनुसार राज्याच्या पी.एम. किसान पथकप्रमुख तथा राज्याच्या कृषी उपायुक्तांनी अशा आयकर भरणाऱ्या जिल्ह्यातील 13 हजार 437 शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठवली आहे.
त्यानुसार या सर्वांकडून आजअखेर या योजनेंतर्गत घेतलेले 13 कोटी 26 लाख 32 हजार रुपयांचे अनुदान पुन्हा वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह मृत, दुबार अथवा चुकीने लाभ मिळालेले 172 शेतकरीही आढळून आले आहेत. त्यांनीही तीन वर्षांत या योजनेचे 14 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त केले आहे. हे अनुदानही वसूल करण्यात येणार आहे.