Maharashtra Govसोलापूर

नुकसानभरपाई तर देऊच, मात्र आत्महत्येचा विचार करू नका ; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सोलापूर: परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. परंतु ज्या सांगवी गावातून मुख्यमंत्री आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार होते, त्या गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना प्रवेशा करण्यास विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधत धीर दिला.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे. गावक-यांनी धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरे यांनी ग्वाही दिली आहे. मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाल्यानंतर ठाकरे हे थेट अक्कलकोटकडे रवाना झाले. तेथील बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. मात्र तत्पूर्वी, गावक-यांनी मुख्यमंत्र्यांनी पुलावरून नुकसानीची पाहणी न करता थेट गावात, बांधावर येऊन पाहणी करावी आणि तेथील अडचणी प्रत्यक्ष गावक-यांशी बोलून जाणून घ्याव्यात, अशी मागणी केली होती. जेथून मुख्यमंत्री ठाकरे हे दोन्ही गावांच्या शिवारातील नुकसानीची पाहणी करणार होते, तेथे गावकऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे.

सेच विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच वाद निर्माण झाला होता, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले गेले, पण, पुलावरुन नुकसान भरपाईची पाहणी करणार कसं? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती, मात्र सुरक्षेचे कारण देत प्रशासनाने गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर काही गावकऱ्यांना रस्त्यावर बोलवण्यात आले, या लोकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आहे.

सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आपण सगळे सोबत आहोत, मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आपल्या पाठीशी उभे आहो. आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका. आपल्याला सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळेल अशी ग्वाही देत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button