नागपुरात 25, 26 जुलै दोन दिवस जनता कर्फ्यू
नागपूर : नागपुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असताना पाहून नागपूर पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल तसेच कडक लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. त्यातून मधला मार्ग काढत आता शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै हे दोन दिवस जनता कर्फ्यू
लावण्यात येणार आहे.नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि लोक नियम पाळत नसल्याने अधिका-यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, नागपुरात पून्हा कडक लॉकडाऊन करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी विरोध दर्शवला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही असे सुचवले होते. त्यानंतर आज याबाबत महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत सविस्तर चर्चा झाली. त्यात सध्या दोन दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचे ठरले आहे.
महापौर संदीप जोशी म्हणाले, “बैठकीत सर्व जनप्रतिनिधींचं मत आम्ही जाणून घेतलं. लॉकडाऊन केलं पाहिजे यासाठी कुणाचाही आग्रह नाही. पण नियम पाळले जात नाहीत. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचं आहे. 25 जुलै आणि 26 जुलै नागपुरात जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल. 27 जुलै ते 30 जुलै या 4 दिवसांमध्ये नागपुरात लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरुन लोकांना आवाहन करणार आहेत.” अशी माहिती महापौर जोशींनी दिली.
शनिवार 25 आणि रविवार 26 जुलैला नागपुरात जनता कर्फ्यू
महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची घोषणा
— Nagpur Municipal Corporation (@ngpnmc) July 24, 2020
तर, “अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकानं उद्या-परवा बंद ठेवावीत. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये. नागरिकांनी नियम पाळले, तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनची वेळ येईल. तेव्हा कर्फ्यू देखील असेल. लोकांनी किमान आपल्या जिवासाठी तरी नियमांचं पालन करावे.” असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.