मुंबई : अखेर विधानपरिषदेच्या त्या 12 जागेंचा तिढा सुटला आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा विषय फक्त चर्चेत होता अखेर आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावे मंत्रिमंडळासमोर ठेवली जाणार आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही. अखेर या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे कळत आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही नावं ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. या जागेवर कुणाला पाठवायचे असा मोठा प्रश्न महाविकास आघाडीच्या सरकारला पडला होता. 12 पैकी 9 आमदार महा विकासआघाडीच्या वाट्याला आले आहेत. तर उर्वरित 3 नावं नक्की कुणाची आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली जाईल.
कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात. त्यामुळे या 12 सदस्यांच्या निवडीचा अधिकार हा राज्यपालांना देण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाने ज्या सदस्यांची नावांची राज्यपालांकडे शिफारस केली जातात, ती स्वीकारली जातात.
दरम्यानच्या काळात राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकामध्ये तणाव पाहायला मिळाला होता. या तणावात राज्यपाल सरकारचे संबंध ताणले गेल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर, राज्य सरकारने आपल्याला अद्याप कोणती नावेच पाठवली नसल्याने आमदारांची निवड कशी करणार असा टोलाही राज्यपाल कोश्यारींनी लगावला होता.
आता मंत्रिमंडळातून आलेल्या नावावर राज्यपाल तातडीने स्वीकारतील का की अजून हे प्रकरण ताणले जाईल हे येणारी वेळच सांगेल.
