दररोज ८० ते ८५ लाख नागरिक मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. जीर्ण होत चाललेले रेल्वेमार्ग आणि रेल्वे पुलामुळे गेले अनेक दिवस सतत लोकल सेवेत अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा आज शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी संसदीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम करणारे रेल्वे कर्मचारी गँगमन आणि ट्रॅकमन हे सुरक्षा श्रेणी कर्मचारी वर्गात मोडले जातात. रेल्वे_सुरक्षा विभागातील गँगमन आणि ट्रॅकमन यांची मोठ्या संख्येवर पदे रिक्त असून मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा आणि सुरक्षा लक्षात घेता ही पदे भरती प्रक्रिया का सुरु करत नाही असा प्रश्न देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या काळात उपस्थित केला.
गेल्या दोन वर्षात ७६२९४ गँगमन आणि ट्रॅकमन यांची भरती झाली असून निवृत्त कर्मचारी तसेच माजी कर्मचारी यांना सुध्दा सेवेमध्ये समावेश करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत तसेच मुंबईतील दिवसा लोकल सेवेवर प्रंचड ताण असल्यामुळे रेल्वे मार्ग व इतर कामे ही रात्री केली जात आहेत, असे उत्तर रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगड़ी चन्नबसप्पा यांनी दिले.