खडसेंच्या राज्यपालपदाच्या शिफारशीचा कागद भाजपच्या सर्वोच्च नेत्याने टराटरा फाडला!
पुणे : भाजपला सोडचिठ्ठी देत उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत भाजपचा एक सर्वोच्च नेता किती नाराज होता याचा एक धक्कादायक किस्सा पुढे आला आहे. खडसे यांना राज्यपाल बनवण्यासंदर्भात शिफारस घेऊन दिल्लीतील एका सर्वोच्च नेत्याकडे रवींद्र भुसारी गेले असता त्यांनी खडसेंच्या शिफारशीचा तो कागद टराटरा फाडला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामाने प्रकाशित केले आहे.
जेव्हा चौकशीच्या फेऱ्यात खडसे अडकलेले होते आणि मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांच्याबद्दलचा त्यांचा धीर सुटू पाहत होता तेव्हा प्रदेश भाजपकडून नाथाभाऊंचे सन्मानजनक पुनवर्सन करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे नाथाभाऊंना एक तर राज्यसभेवर पाठवावे किंवा त्यांना राज्यपाल तरी करावे, असा प्रस्ताव प्रदेश कोर टीमने तयार केला होता. तो प्रस्ताव घेऊन तत्कालीन प्रदेश संघटन सरचिटणीस रवींद्र भुसारी हे दिल्ली दरबारात गेले होते. त्यांनी हा प्रस्ताव संबंधित वरिष्ठांना सांगितला आणि त्यांची संमतीही घेतली होती. खडसे यांनी काल भाजप सोडल्यानंतर ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन ठरवत आहेत. मात्र खडसे यांच्यावर हा सर्वोच्च नेता खूपच नाराज होता.
जेव्हा खडसेंना राज्यपाल करण्याबाबतची शिफारस घेऊन भुसारी त्या सर्वोच्च नेत्याकडे गेले तेव्हा त्या नेत्याने रुद्रावतार दाखविला होता. दिल्लीतील अतिशय विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भुसारी हा प्रस्ताव घेऊन ‘सर्वोच्च नेत्या’ला भेटले. एरवी इतरांचे अतिशय शांतपणे ऐकून घेण्याचा लौकिक असलेल्या या ‘सर्वोच्च नेत्या’ने अक्षरशः रुद्रावतार धारण केला. एवढेच नव्हे, तर प्रदेश भाजपने दिलेल्या त्या प्रस्तावाचे पत्र अक्षरशः भिरकावून दिले. “अशा व्यक्तीला तुम्ही राज्यपाल बनविण्याची शिफारस करीत आहात… तुमचे डोके फिरले आहे का?”
या शब्दांत तो ‘सर्वोच्च नेता’ भुसारींवर भडकला होता. त्या ‘सर्वोच्च नेत्या’चा हा पवित्रा पाहिल्यानंतरच अतिशय स्पष्ट झाले होते, काहीही झाले तरी खडसेंचे पुनवर्सन शक्य नाही! आणि झालेही तसेच. त्या घटनेला तीन वर्षे झाली. खडसेंचे शेवटपर्यंत पुनवर्सन झालेच नाही. ना विधानसभेचे तिकीट, ना राज्यसभा, ना विधानपरिषद, ना राज्यपालपद मिळाले. त्यांना नाइलाजास्तव पक्ष सोडावा लागला.
