विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही ; गुणपत्रिकेवर कोविड – 19 चा शिक्का नसेल – कृषी मंत्री दादा भुसे
मुंबई :- कृषी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रिका किंवा सर्टिफिकेटवर कोव्हिड-19 असा शिक्का नसेल किंवा कुठेही तसा उल्लेख नसेल, अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
कोरोना काळात परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे निकाल दिला जात आहे. मात्र या गुणपत्रिकांवर कोव्हिड-19 असा उल्लेख नको, या मागणीचा आग्रह होत असताना कृषी मंत्री दादा भूसे यांनी विद्यार्थी व पालकांना निश्चिंत राहण्यास सांगितले आहे. गुणपत्रिकेवर असा कोणताही उल्लेख नसेल अशी ग्वाही भूसे यांनी दिली आहे. तसेच, गुणपत्रिकेवर कोविड चा शिक्का नसावा यांसाठी माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला आहे.
त्याबाबत स्पष्टीकरण देताना कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, आधीच्या सत्रातील परीक्षांचे गुण आणि शेवटच्या वर्षाचे 50 टक्के गुण या सूत्रानुसार निकाल जाहीर करण्यात येईल. मात्र त्यावर कोव्हिडबाबत कोणताही उल्लेख नसेल. हे निकाल जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होतील. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही” तसेच, ज्या गुणपत्रिकांवर कोविड–19 चा शिक्का आहे तो काढण्याचे आदेश दिले जाईल व असा शिक्का मारणा-या अधिका-यांवर कारवाई केल्या जाईल असेही दादा भूसे यांनी सांगितले.

