अॅप्स झाले आता ‘चायना मोबाईल हँडसेट’ची बारी
मुंबई: कोरोना विषाणुच्या प्रसारानंतर जगात, देशात अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या आहेत. ज्या कोरोना विषाणुने संपुर्ण जगाला हादरवून सोडले त्या कोरोनाचा प्रसार चीनमधूनच झाल्याचा दावा करत अनेक देशांनी चीनला फटकारलेदेखील आहे. तर, भारताने चीनला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतातून पबजीसह 118 चिनी अॅपवर बंदी आणली. भारताच्या या निर्णयाने चीनल चांगलीच मिर्ची झोंबली आहे.
एवढेच नाही तर, एकीकडे कोरोनाचा जगभर प्रसार तर दुसरीकडे सीमेवर चीनच्या कुरापतीही वाढलेल्या पाहून भारताने चीनला नमविण्यासाठी आपले दंडच थोपटले आहे. कारण हायस्पिडच्या या इंटरनेटच्या जगात अॅप्स असो वा मोबाईल हॅंडसेट यावर निर्बंध घालणे म्हणजे संबंधीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान तसेच त्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला फटका बसणे होय. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने चीनला पुन्हा एक धक्का देण्याची तयारी केलेली दिसत आहे.
चीनी अॅपनंतर आता चायना मोबाइल हॅण्डसेटवरही बंदी घालण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत डिजिटल कम्युनिकेशन कमीशनकडून डेटाची प्रायव्हसी आणि सुरक्षेच्या सिफारशींना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
भारतामधील डेटाची चोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताने 118 चायना अॅपवर बंदी घातली होती. त्यामध्ये पबजी अॅपवरही बॅन करण्यात आला. या बंदी घातलेल्या मोबाईल अॅपपैकी एकट्या पबजीचे भारतात 5 कोटी वापरकर्ते होते. याआधीही भारताने चिनी बनावटीच्या 59 अॅपवर बंदी घातली होती. आता, भारताकडून चायना कंपनीच्या मोबाईल हँण्डसेटवरही बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे, भारतीय स्टार्ट अप कंपन्यांनी विविध अॅप विकसित करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. विविध सरकारी प्रकल्पांची कामे चिनी कंपन्यांना न देण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भरचा नारा दिल्यानंतर काही दिवसांतच, केंद्र सरकारने चायना अॅपवर बंदी घातली हे विशेष.