दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय, देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई: हिवाळी अधिवेशन कधी आणि कुठे होणार असा प्रश्न होता. त्याचे उत्तर अखेर आले आहे. हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला होणार आहे. हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार असल्याचे नक्की झाले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईतच होण्याची शक्यता होती. ७,८ आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस अधिवेशन होण्याची शक्यता होती. मात्र, आता २ दिवसच हे अधिवेशन होणार आहे.
यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, १४ आणि १५ तारखेला होणारं दोन दिवसीय अधिवेशन मान्य नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
दोन दिवसांचं अधिवेशन होतंय, आमचा आग्रह होता की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, कापूस, सोयाबीनचं मोठ नुकसान झालंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला खडे बोल सुनावले जात आहेत. विधानभवन हे महत्त्वाचं स्थान असताना दोन दिवसांचे अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.