१४० नंबरबाबत दहशतीचे कारण नाही; महाराष्ट्र सायबरकडून स्पष्ट
मुंबई : १४० या नंबरने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाजमाध्यमावर फिरत आहेत, त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
१४० या नंबरने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते. असा मेसेज सध्या सर्वच समाजमाध्यमातून फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबरकडून आवाहन करण्यात आले आहे. सध्या अशा फिरणा-या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही, पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही.
जर आपण १४० ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून येणारा फोन कॉल उचलल्यास घाबरु नये, पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिले गेलेले असतात. परंतु हेदेखील लक्षात ठेवावे की,अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती,बँक डिटेल्स,डेबिट, क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर ओटीपी देऊ नये अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

