आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला
संसदेत विरोधकांचा आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलत गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषीविषयक विधेयकांना रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही मंजुरी मिळाली. त्यामुळे या विधेयकांना आता कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. यानंतर कृषी विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया गेटवर आंदोलकांनी ट्रॅक्टर पेटवून विरोध दर्शवला.
राजपथवर कृषी विधेयकावरून आंदोलन सुरू असताना पंजाब युवक काँग्रेसच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात आंदोलन सुरू आहे. सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या.
अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे कर्नाटकात शेतकरी संघटनांनी आज बंद पुकारला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज भगत सिंह नगरमध्ये कायद्याविरोधात धरणे देणार आहेत. तर पंजाब, हरियाणासहित देशातील अनेक भागांत आंदोलकांनी चक्का जाम आंदोलनाला सुरुवात केली आहे.
